समुद्रातील पाणी गोडे करण्यासाठी ऑस्ट्रेलियातील कंपनीवर महापालिकेची ‘ही’ जबाबदारी

113

मुंबईच्या पाणी पुरवठ्यात वाढ करण्यासाठी महापालिकेने समुद्राचे पाणी गोडे करण्याचा अर्थात नि:क्षारीकरण प्रकल्प हाती घेतला आहे. प्रतिदिन २०० दशलक्ष लिटर अर्थात २० कोटी लिटरचा हा प्रकल्प राबवण्यासाठी महापालिकेने सल्लागाराची नेमणूक केली आहे. यासाठी ‘स्मेक इंडिया’ या कंपनीची नेमणूक करण्यात येत असून यासाठी १० कोटी ६३ लाख रुपये खर्च केले जाणार आहे. ऑस्ट्रेलियातील ही कंपनी असून त्यांनी सिडनी आणि ऍडलेड येथे समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प राबवला आहे.

( हेही वाचा : भाजपचे महापौरांना पत्र, ‘या’ नेत्यावर दाखवला अविश्वास )

समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प

मुंबईला सध्या होत असलेल्या पाणी पुरवठ्यात वाढ करण्याच्या दृष्टीकोनातून गारगाई, दमण-गंगा पिंजाळ पाणी प्रकल्प हाती घेणाऱ्या महापालिकेने अचानकपणे समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला. महापालिका प्रशासन आणि सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून मालाड येथील समुद्र किनारी हा प्रकल्प राबवण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी महापालिकेने ‘मेसर्स डि.आय.ई.वॉटर टेक्नोलॉजीज लिमिटेड’ कंपनीला सविस्तर प्रकल्प अहवाल बनवण्याचे काम देण्यात आले आहे. मात्र, या कामासाठी संकल्पचित्रे व निविदा प्रक्रिया राबवण्यासाठी सल्लागाराची नेमणूक करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर सल्लागार सेवेसाठी निविदा मागवण्यात आली होती.

( हेही वाचा : महापालिका कर्मचाऱ्यांना १५ हजारांचा वैयक्तिक आरोग्य विमा )

स्मेक इंडिया कंपनीची नेमणूक

या आंतरराष्ट्रीय स्तरावरील निविदेमध्ये कंपन्या तथा संस्थांनी भाग घेतला होता. यामध्ये स्मेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी पात्र ठरली आहे. तांत्रिक गुण, आर्थिक गुण या आधारे या कंपन्यांना यापूर्वीच्या अनुभवाच्या आधारे गुण देण्यात आले. यामध्ये स्मेक इंडिया या कंपनीला ९५.२० गुण प्राप्त झाले आहे. स्मेक इंडिया या कंपनीने भारतात एका मोठ्या नि:क्षारीकरण प्रकल्पाचे काम केले आहे. मागील ७५ वर्षांपासून विविध जल प्रकल्पांमध्ये कार्यरत आहे. स्मेक ही कंपनी पटल तंत्रज्ञानात २००३ पासून कार्यरत आहे. ऑस्ट्रेलियातील पॅराडाईज धरणाच्या कामात २००७ पासून या तंत्राचा वापर करण्यात आला आहे. या कंपनीने ऍडलेड येथील प्रतिदिन २७५ दशलक्ष लिटर क्षमतेच्या नि:क्षारीकरणाचे काम केले आहे, तर सिडनी येथेही प्रतिदिन २५० दशलक्ष लिटर क्षमतेच्या प्रकल्पाच्या कामाची देखभाल केली आहे. तसेच व्हिक्टोरिया येथेही ४१० दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेच्या प्रकल्पाचे काम केले आहे. शिवाय चेन्नई येथील प्रतिदिन ४०० दशलक्ष लिटर क्षमतेच्या समुद्राचे पाणी गोडे करण्याच्या सविस्तर प्रकल्प अहवाल बनवण्याच्या कामातही मुख्य भागीदार म्हणून काम केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.