शहरातील समुद्राच्या पातमुखांवर बसवणार ट्रॅशबूम

93

मुंबईतील किनारपट्टीच्या परिसरामध्ये मोठ्याप्रमाणात प्लास्टिक पसरत असल्याने, हा तरंगता प्लास्टिक कचरा व इतर कचरा गोळा करण्यासाठी शहर भागातील नाल्यांच्या, समुद्राच्या पातमुखांवर महापालिकेच्यावतीने ट्रॅश ट्रॅप तथा ट्रॅश बूम बसवले जाणार आहेत.

हरित लवादाने महापालिकेला केलेल्या सूचनांनंतर आता खारफुटीच्या जागांसह नाल्यांमधून समुद्रात जाणारा प्लास्टिकसह तरंगता कचरा रोखण्यासाठी ट्रॅशबूम किंवा ट्रॅश ट्रॅप बसवण्यात येत असून हरित लवादाच्या मार्गदर्शक तत्वानुसार मुंबई शहरातील विविध पावसाळी जलवाहिनींच्या पातमुखांवर याचा वापर केला जातो. त्यामुळे या कामांसाठी ३ वर्षांच्या प्रचालन व परिरक्षणासाठी मागवलेल्या निविदांमध्ये एचइसी एन्वायरो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आली आहे. यासाठी विविध करांसह ४ कोटी ६६ लाख रुपयांचा खर्च केला जाणार आहे.

( हेही वाचा : कळंबोलीत जीएसटी घोटाळा, रक्कम वाचून व्हालं थक्क )

तरंगता कचरा रोखण्यासाठी वापर

अजोय मेहता आयुक्त असताना त्यांनी अशाप्रकारच्या ट्रॅश बूमचा वापर करण्याची संकल्पना मांडली होती. आणि त्यानुसार २०१८पासून समुद्रात जाणारा तरंगता कचरा रोखण्यासाठी या पध्दतीचा वापर केला जाईल अशी घोषणा केली होती आणि त्यानुसार पहिल्या टप्प्यात चार नद्यांसह तीन नाल्यांवर अशाप्रकारची ट्रॅश बूम बसवण्याची घोषणा केली होती.

सर्वांत प्रथम नदी आणि खाड्यांच्या मुखावर ही यंत्रणा बसवली जाणार होती. परंतु प्रशासनाने खाड्यांऐवजी आता नाल्यांचा समावेश केला. दहिसर नदी, मिठी नदी, पोईसर नदी, ओशिवरा नदी, मोगरा नाला, इर्ला नाला तसेच लव्हग्रोव्ह नाला आदी ठिकाणी ही ट्रॅश बूम बसवली गेली होती. ही यंत्रणा बसवण्यासाठी मेसर्स क्लिनटेक इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची निवड करण्यात आली होती आणि यासाठी १ कोटी १७ लाख रुपयांचे कंत्राट मार्च २०१८मध्ये देण्यात आले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.