‘वंदे भारत’ने तोडला बुलेट ट्रेनचा रेकॉर्ड!

पाच तासांत कापले अहमदाबाद-मुंबई ४९२ किमी अंतर

143

‘वंदे भारत’ ट्रेनने जगातील सर्वांत वेगवान रेल्वे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बुलेट ट्रेनला मागे टाकले आहे. ० ते १०० किमी ताशी वेग पकडण्यासाठी ‘वंदे भारत’ने अवघे ५२ सेकंद घेतले. तर बुलेट ट्रेनला ५४ सेकंद लागतात. अहमदाबाद ते मुंबई दरम्यानचे ४९२ किमी अंतर ‘वंदे भारत’ने अवघ्या पाच तासांमध्येच कापले. सकाळी सव्वा सात वाजता निघालेली रेल्वे दुपारी १२.१६ वाजता मुंबई सेंट्रल येथे पाेहाेचली.

(हेही वाचा – प्रभादेवीतील शिवसेना विरूद्ध शिंदे गटातील राडा प्रकरणी २५ शिवसैनिकांवर गुन्हा दाखल)

अहमदाबाद ते मुंबई धावणार वंदे भारत

वंदे भारत रेल्वेच्या देशातील विविध भागात चाचण्या सुरू आहेत. अहमदाबाद ते मुंबई या मार्गावर नुकतीच चाचणी घेण्यात आली. त्यावेळी वंदे भारतने केवळ ५२ सेकंदांमध्ये ताशी १०० किमी एवढा वेग घेतला. बुलेट ट्रेनला यासाठी ५४.६ सेकंद लागतात. अहमदाबाद-मुंबई वंदे भारत रेल्वे ३० सप्टेंबरपासून सुरू हाेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नवरात्रीच्या निमित्ताने ही भेट प्रवाशांना मिळू शकते.

नव्या गाड्यांचा ताशी १८० किमी वेग 

वेगवेगळ्या रेल्वे विभागांमध्ये वंदे भारतच्या चाचण्या झाल्या. त्यावेळी ही गाडी ताशी १८० किमी एवढ्या वेगाने धावली. जुन्या वंदे भारतचा वेग ताशी १६० किमी एवढा आहे. तर यावर प्रतिक्रिया देताना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, वंदे भारत ट्रेनने बुलेट ट्रेनला मागे टाकले आहे. अहमदाबाद – मुंबई मार्गावर देशातील तिसरी वंदे भारत ट्रेन चालवली जाईल. ही गाडी प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी तयार करण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.