शतजन्म शोधिताना… समग्र सावरकर अनुभवताना सभागृह झाले सावरकरमय

206

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ५७व्या आत्मार्पण दिनी ‘शोध हा नवा-शतजन्म शोधिताना’ हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने राष्ट्राभिमान जागृत करणारा ठरला. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या सावरकर सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने राष्ट्रप्रेमी उपस्थित होते. वीर सावरकरांनी लिहिले विविधांगी साहित्य हे नाट्य, नृत्य आणि संगीताच्या माध्यमातून रसिकांसमोर मांडणे महाकठीण. अशा या कार्यक्रमाची संहिता लिहिण्याचे महत्कार्य स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे यांनी केले. ज्याचे सादरीकरण ज्येष्ठ नृत्यांगना आणि या कार्यक्रमाच्या नृत्य दिग्दर्शिका डॉ. रूपाली देसाई आणि ज्येष्ठ गायिका वर्षा भावे यांच्या चमूने केले. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि महाराष्ट्र मिलिटरी स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने निर्मित ‘शोध हा नवा – शतजन्म शोधिताना’ या कार्यक्रमाचे संस्कृती कल्चर अकॅडेमी यांच्या तर्फे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या वेळी अवघे सावरकर सभागृह सावरकरमय झाले होते.

shatjanm

स्वातंत्र्यवीर सावरकर केवळ क्रांतिकारकांचे मुकुटमणी नव्हते, तर ते उत्तम साहित्यिक, नाट्यलेखक, विचारवंत, दुरदृष्टी असलेले द्रष्टे राजकारणी, विज्ञानवादी, इतिहास संशोधक, पत्रकार आणि अस्पृश्यता निवारक होते, त्यांनी आंग्ल भाषेतील अनेक शब्दांना मराठी भाषेत प्रतिशब्द निर्माण केले, जे आज मराठी भाषेत प्रचलित झाले आहेत. संपूर्ण आयुष्यात बहुगुणी, बहुआयामी भूमिका निभावणारे वीर सावरकर यांनी त्या-त्या कलागुणांचा आविष्कार करणारे विपुल साहित्य लिखाण केले. या साहित्याच्या आधारे ‘शोध नवा – शत जन्म शोधिताना’ या कार्यक्रमाची संहिता लिहून मंजिरी मराठे यांनी वीर सावरकर यांच्या देशहिताच्या विचारांचे दर्शन घडवून दिले. या सुंदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वतः स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे आणि श्रीराम केळकर यांनी केले.

(हेही वाचा वीर सावरकरांचा ५७वा आत्मार्पण दिन; शोध हा नवा – शतजन्म शोधिताना)

असा झाला कार्यक्रम

  • आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर तानाजी मालुसरे यांनी सिंहगड जिंकला, त्यांच्या या वीरश्रीचे वर्णन करणारा वीर सावरकर यांनी लिहिलेला पोवडा उपस्थितांमध्ये चेतना जागृत करून गेला.

Shatajanma 3

  • सावरकर यांनी लिहिलेली लावणी रसिकांना सभ्यतेची आणि नैतिकेची शिकवण देवून गेली.

Shatajanma 1

  • सावरकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांची लिहिलेली आरती आणि त्यांचे गुणगान गाणारे ‘हे हिंदू शक्ती…’ या गाण्यांनी रसिकांमध्ये शिवरायांप्रती अभिमान जागृत केला.

Shatajanma 5

  • पुरी येथे श्री जगन्नाथाच्या भव्य रथोत्सवाचे आयोजन करण्यात येते. वीर सावरकर यांनी या रथोत्सवाच्या भव्योदत्त कल्पनेचे केलेले शब्दचित्र म्हणजे जगन्नाथाचा रथोत्सव, त्याचेही उत्तम सादरीकरण या कार्यक्रमात करण्यात आले. हे गीत रसिकांना थेट श्री जगन्नाथाच्या रथोत्सवाची अनुभूती देऊन गेले.

Shatajanma 2

  • पानिपतचे युद्ध झाले, पेशव्यांनी अटकेपार झेंडा रोवला, पण दुर्दैवाने हे युद्ध मराठे हरले. पानिपत पुण्याच्या उत्तरेला आहे, त्यामुळे उत्तर जिंकण्याची जी क्रिया ती ‘उत्तरक्रिया’ असा संदेश सावरकर यांनी दिला. त्या हरलेल्या पानिपत युद्धाचा सूड घ्या, असा संदेश वीर सावरकर यांनी या नाटकातून दिला. या नाटकातील एक प्रवेश या वेळी सादर करण्यात आला, ज्याने उपस्थितांच्या अंगावर अक्षरशः शहारे आले.
  • रत्नागिरीत स्थानबद्ध असताना वीर सावरकर यांनी अस्पृश्यता निवारणाचे महान कार्य केले. त्यावेळी त्यांनी पतीत पावन मंदिर उभारून पूर्वास्पृश्यांना गाभाऱ्यात जावून देवाचे दर्शन घेवू दिले, त्यावेळीची पूर्वास्पृश्यांची अवस्था वीर सावरकर यांनी ‘मला देवाचे दर्शन घेवू द्या…’ या गीताच्या माध्यमातून मांडली, या कार्यक्रमात हे गीत नृत्याच्या आधारे सादर करून कलाकारांनी उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू आणले.

Shatajanma 1

  • जातीपातीत अडकलेल्या हिंदूंना तुम्ही एक आहात असा संदेश देणारे वीर सावरकरांचे ‘तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधू..’ हे काव्य आजही हिंदू समाजाला लागू पडते, याचेही सादरीकरण यावेळी करण्यात आले.

Shatajanma 4

  • कार्यक्रमाच्या संहितेतून वीर सावरकर यांनी रत्नागिरी येथे केलेले समाजप्रबोधनाचे महान कार्य अधोरेखित झाले. परदेशात असताना आपल्या मातृभूमीच्या भेटीसाठी व्याकूळ झालेले असताना वीर सावरकर यांना सागराला साद घालत ‘ने मजसी ने परत या मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला…’ हे गीत स्फुरले. या गीताने या कार्यक्रमाचा समारोप झाला.
  • ज्येष्ठ गायिका वर्षा भावे यांनी गायलेले कार्यक्रमाचे शीर्षक गीत ‘शतजन्म शोधिताना’ आणि मयूर सुकाळे यांनी गायलेला पोवाडा विशेष दाद मिळवून गेला.

Shatajanma 6

(हेही वाचा हिंदू राष्ट्रासाठी वीर सावरकरांची दिशा म्हणजे राजकारणाचे हिंदूकरण)

अशा रीतीने वीर सावरकर यांनी लिहिलेला पोवाडा, फटका, त्यांच्या नाटकातील प्रवेश, त्यांची छायाचित्रे, सावरकर चित्रपटातील दृश्य या साऱ्या माध्यमातून सावरकरांचे बहुआयामी व्यक्तिमत्व या नाटकातून अधोरेखित झाले. वीर सावरकर यांचे विचार हे स्वतंत्र्य भारताच्या ७५ वर्षांनंतरही तंतोतंत लागू पडतात. सांप्रत काळात देश आणि धर्माचा अभिमान बाळगत असताना प्रसंगानुरूप कसा विचार करायला हवा, याचे मार्गदर्शन या कार्यक्रमाच्या संहितेतून उपस्थित राष्ट्रप्रेमी रसिकांना झाले.

या कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे यांचा सत्कार करण्यात आला. त्यासोबत या कार्यक्रमाच्या संगीत दिग्दर्शिका वर्षा भावे, संगीत संयोजक कमलेश भडकमकर, नृत्य दिग्दर्शिका डॉ. रुपाली देसाई यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, कार्यवाह राजेंद्र वराडकर आणि सह कार्यवाह स्वप्नील सावरकर या सर्वांचे आयोजकांनी आभार मानले.

तसेच सावरकर स्मारकाचे संजय चेंदवणकर, अदिती मडकीकर, जयश्री पोरे, रितिका सुर्वे, विनोद कातकर, निवृत्ती राऊळ, सचिन पवार, धनंजय शिंदे, निखिल कोचरेकर, रोहित बामणे, योगेश कदम, सागर गावडे, अमन दिवेकर आणि रवींद्र बिवलकर या स्मारकाच्या कर्मचाऱ्यांचाही आयोजकांनी सत्कार केला.

(हेही वाचा माझी जन्मठेप : अनोखा रंगमंचीय आविष्कार)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.