राज्यातील शिधावाटप दुकानांमधून भाजीपाला व फळांची विक्री करण्यास परवानगी दिली जाणार आहे. त्याची सुरुवात मुंबई, ठाणे व पुणे जिल्ह्यांतून करण्यात येणार आहे. राज्यातील शिधावाटप किंवा रास्तभाव दुकाने आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे.
…म्हणून फळे भाजीपाला विकण्यास परवानगी
राज्यात 50 हजारांहून अधिक रास्तभाव दुकाने आहेत. केवळ अन्नधान्यांच्या विक्रीवर अवलंबून असणा-या या दुकानदारांचे उत्पन्न वाढावे, यासाठी विविध वस्तू, उत्पादने विक्रीस परवानगी देण्यात आली आहे. त्याच पद्धतीने आता नोंदणीकृत शेतकरी उत्पादन कंपनीस सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत रास्तभाव दुकानांमधून शेतक-यांनी उत्पादित केलेला भाजीपाला व फळे विक्रीसाठी परवानगी देण्याचे सरकारने ठरवले आहे.
( हेही वाचा: शिवसेना आमदारांना रिट्रीट, तर भाजप आमदारांना ताज! राज्यसभेसाठी ‘हॉटेल मॅनेजमेंट’ )
सहा महिन्यांकरता परवानगी
त्यानुसार राज्य शासनाने आता मुंबई, ठाणे व पुणे जिल्ह्यांतील रास्तभाव दुकानांमधून भाजीपाला व फळे विक्रीसाठी प्रायोगिक तत्वावर सहा महिन्यांकरता परवानगी दिली. अन्न व नागरी पुरवठा विभागाने सोमवारी त्याबाबतचा शासन आदेश जारी केला आहे.