आमच्या धार्मिक भावना दुखावण्याचा अधिकार कोणी दिला?

152

आपली धार्मिक संस्कृती, परंपरा, श्रद्धास्थाने यांना कोणत्याही प्रकारचे वेगळे स्वरूप देण्याची काहीही आवश्यकता नाही. आपल्या ज्या धार्मिक, सांस्कृतिक मान्यता आहेत, त्या जशा आहेत, त्यांना तसेच ठेवणे अपेक्षित आहे. त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्याची आवश्यकता नाही, तसेच कुणीही त्यात बदल करू नये. काही चित्रपट निर्माते, काही लेखक, काही दिग्दर्शक यांनी या विषयाचा गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे. क्रिएटिव्हिटी आणि विचार स्वातंत्र्याच्या नावाखाली कुणी धर्माचे विडंबन करू नये. धार्मिक आणि सांस्कृतिक मान्यतांचे तोडूनमोडून सादरीकरण करू नये. जर इतर धर्मातील धार्मिक, सांस्कृतिक मान्यतांचे कोणी विडंबन करण्याचे धाडस करत नाही, तर मग हिंदू धर्मातील धार्मिक आणि सांस्कृतिक मान्यतांचे विडंबन का केले जात आहे?

रामायण, महाभारत, श्रीमद् भागवत गीतासारखे जे ग्रंथ आहेत, ते आपले सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरा आहेत. ती आपली संस्कृती आहे. सगळ्या मानवजातीसाठी ते एक मार्गदर्शक आहेत. हा आपला पाया आहे. हा पाय कोणाकडून हलवला जाऊ शकत नाही. त्यांचे विडंबन हे स्वीकारहार्य नाही. आपल्याला या धर्म ग्रंथांमधून संस्कार मिळत असतात. जीवनात मार्गक्रमण कसे करायचे याविषयी दिशा मिळते.

आपली संस्कृती ही विश्वातील सर्वात प्राचीन संस्कृती आहे. युगानुयुगे आपली प्रत्येक पिढी ती आत्मसात करत आहे. ५०० वर्षांपासून संघर्ष अथक प्रयत्नानंतर, रक्त सांडल्यावर आपल्याला श्रीराम मंदिराच्या बाजूने निर्णय मिळाला आहे. तिथे एका भव्य मंदिराचे निर्माण होत आहे. हे मंदिर २०२४ पर्यंत पूर्ण होईल. मंदिराला भव्य स्वरूप देण्याबरोबर त्याचा आत्मा आणि मूल्य जसेच्या तसे ठेवून हे मंदिर उभे राहत आहे. कोणी आपले मूळ बदलते का? सध्या सनातन धर्माचे विडंबन करण्याची सवय बनली आहे. देवीदेवतांचे आक्षेपार्ह पोस्टर बनवणे, अभद्र भाषेत बोलताना दाखवणे असे करण्याचा, आमच्या धार्मिक भावना दुखावण्याचा अधिकार कोणी दिला?

अरुण गोविल (लेखक रामानंद सागर दिग्दर्शित ‘रामायण’ मालिकेतील श्रीरामाची भूमिका केलेले ज्येष्ठ अभिनेते आहेत.)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.