-
ऋजुता लुकतुके
क्रिकेटपटूंच्या बीसीसीआयशी (BCCI) होणाऱ्या मध्यवर्ती करारांची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. कारण, शनिवारी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर (Ajit Agarkar) यांची बीसीसीआय (BCCI) कार्यालयात बैठक होणार आहे. त्यात मध्यवर्ती करारांवरच चर्चा अपेक्षित आहे. बैठकीत बीसीसीआयसमोर दोन महत्त्वाचे मुद्दे असतील. एक म्हणजे रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जाडेजा या तिघांनी टी-२० प्रकारातून निवृत्ती घेतली आहे. तीनही प्रकार न खेळणारे खेळाडू म्हणून त्यांची श्रेणी कमी करायची का? आणि दुसरा मुद्दा गेल्यावर्षी करारातून वगळलेल्या श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) पुन्हा घ्यायचं का?
तीनही ज्येष्ठ खेळाडूंवर बीसीसीआय (BCCI) सकारात्मक निर्णय घेण्याचीच शक्यता जास्त आहे. म्हणजे विराट, रोहित आणि जाडेजा यांची ए प्लस श्रेणी कायम ठेवली जाऊ शकते. तर श्रेयस या हंगामात १३ एकदिवसीय सामने भारताकडून खेळला आहे. त्यामुळे तो करारासाठी पात्र आहे. अशावेळी त्याचा समावेश अ श्रेणीत होऊ शकतो.
(हेही वाचा – West Bengal मध्ये हिंसाचार; हिंदूंच्या दुकानांना आणि घरांना धर्मांधांनी केले लक्ष्य)
बीसीसीआयच्या (BCCI) मध्यवर्ती करारांच्या यादीत खेळाडूंच्या ए प्लस, ए आणि बी अशा तीन श्रेणी ठरवण्यात आल्या आहेत. ज्येष्ठता आणि कौशल्यानुसार या श्रेणी ठरवलेल्या आहेत. यातील ए प्लस श्रेणीच्या खेळाडूंना करारापोटी पार्षिक ७ कोटी रुपये मिळतात. तर ए श्रेणीच्या खेळाडूंना ५ कोटी रुपये मिळतात. बी श्रेणीतील क्रिकेटपटूंनी प्रत्येकी वार्षिक ३ कोटी रुपये बीसीसीआयकडून मिळतात.
राष्ट्रीय निवड समिती मुख्य प्रशिक्षक आणि बीसीसीआयचे (BCCI) सचिव यांच्याशी चर्चा करून खेळाडूंची श्रेणी ठरवत असते. मागच्या वर्षी एकूण ३० पुरुष खेळाडू या यादीत होते. यंदा रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) आंतरराष्ट्रीय निवृत्ती पत्करली आहे. त्यामुळे त्याची जागा रिक्त आहे. ए प्लस श्रेणीत विराट, रोहित, जाडेजा आणि बुमराह यांची नावं सध्या आहेत. पण, यातील फक्त बुमराह तीनही प्रकार खेळतो. पण, इतर तिघांना सध्या कुणी हात लावेल अशी शक्यता कमीच आहे.
तर ए श्रेणीत अय्यर (Shreyas Iyer) वापसी करू शकतो. अक्षर पटेलवर (Akshar Patel) अलीकडेच टी-२० प्रकारात उपकर्णधाराची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्याला ब श्रेणीतून ए श्रेणीत बढती मिळू शकते. यशस्वी जयस्वाललाही यंदा ए श्रेणीत बढती मिळू शकते. करारांच्या यादीत पोहोचण्यासटी खेळाडूला एका वर्षांत ३ कसोटी, ८ एकदिवसीय आणि १० टी-२० सामने खेळावे लागतात. या निकषांवर सर्फराझ खान, नितिश कुमार आणि आकाशदीप यांची यंदा वर्णी लागणं अनिवार्य आहे. डावखुरा फलंदाज आणि यष्टीरक्षक ईशान किशनवर बीसीसीआय (BCCI) काय निर्णय घेतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. तर शार्दूल ठाकूर आणि ऋतुराज गायकवाड भारतीय संघाकडून खेळलेले नसल्यामुळे त्यांची मध्यवर्ती करारातून गच्छंती अटळ आहे.