Ind vs Eng 3rd Test : ‘कसोटी जिंकायची असेल तर ५ दिवस ती खेळायची तयारी पाहिजे,’ रोहितचा इंग्लिश संघाला टोमणा

मालिकेतील तिसऱ्या कसोटींत भारताने इंग्लंडवर पूर्ण वर्चस्व गाजवत विजय मिळवला आणि बॅझबॉल रणनीतीलाच एकप्रकारे उत्तर दिलं. 

164
Ind vs Eng 3rd Test : ‘कसोटी जिंकायची असेल तर ५ दिवस ती खेळायची तयारी पाहिजे,’ रोहितचा इंग्लिश संघाला टोमणा
  • ऋजुता लुकतुके

राजकोट कसोटीत भारतीय संघाने (Indian team) इंग्लंडवर संपूर्ण वर्चस्व गाजवलं. आणि कसोटीतील सगळ्यात मोठा म्हणजे ४३४ धावांनी विजय मिळवला. या विजयानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माने इंग्लंडच्या ‘बॅझबॉल’ रणनीतीवर थोडंफार तोंडसुख घेतलं आहे. २-३ दिवसांत विजय मिळवण्यापेक्षा कसोटीचे ५ ही दिवस स्पर्धात्मक राहणं जास्त महत्त्वाचं आहे, असं रोहीत बॅझबॉलचं नावही न घेता म्हणाला. (Ind vs Eng 3rd Test)

राजकोट कसोटीत भारतातर्फे रवींद्र जडेजाने पहिल्या डावात शतक तसंच दुसऱ्या डावात ५ बळी घेतले. तर रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल आणि सर्फराझ खान फलंदाजीत चमकले. सिराज, बुमरा, कुलदीप आणि अश्विन या गोलंदाजांची कामगिरीही चांगली झाली. त्याच्या जोरावर भारताने इंग्लंडचा ४ दिवसांतच पराभव केला. आणि मालिकेतही २-१ ने आघाडी घेतली आहे. (Ind vs Eng 3rd Test)

(हेही वाचा – Raj Thackeray : मराठा आरक्षणासाठी होणाऱ्या विशेष विधिमंडळ अधिवेशनावर राज ठाकरेंची टीका; म्हणाले…)

…तरी आम्ही हिंमत हरलो नाही – रोहित 

‘कसोटी क्रिकेट खेळत असताना तुम्हाला ५ दिवसांचा विचार करावा लागतो. २-३ दिवसांसाठी नाही तर ५ ही दिवस चांगलं क्रिकेट खेळावं लागतं. आम्ही त्यासाठी तयार होतो. आणि संघातील दर्जात्मक खेळाडूंवर आम्ही विश्वास ठेवला. त्यामुळे पहिल्या डावात इंग्लिश फलंदाजांनी चांगले फटके खेळले. तरी आम्ही हिंमत हरलो नाही. आम्ही वाट पाहिली. आणि संधी मिळताक्षणी पुन्हा सामन्यावर वर्चस्व मिळवलं,’ रोहितने सामना संपल्यानंतरच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात सांगितलं. (Ind vs Eng 3rd Test)

रवींद्र जडेजाला पहिल्या डावात पाचव्या क्रमांकावर पाठवण्याच्या निर्णयाचं त्याने समर्थन केलं. ‘जडेजा कसोटीतील अनुभवी खेळाडू आहे. अलीकडे त्याने चांगल्या धावा केल्या आहेत. शिवाय मैदानावर उजवी-डावी जोडी खेळवणंही आम्हाला तेव्हा महत्त्वाचं वाटत होतं. सर्फराझवर विश्वास होताच. पण, पहिल्याच कसोटीत त्याला स्वत:ला वेळ देता यावा यासाठी आम्ही त्याला सहाव्या क्रमांकावर खेळवलं,’ असं रोहितने स्पष्ट केलं. (Ind vs Eng 3rd Test)

(हेही वाचा – Congress अद्याप अशोक चव्हाण यांच्या धक्क्यात, Mahavikas Aghadi जागावाटप विसरले)

चौथी कसोटी २३ फेब्रुवारीपासून

युवा फलंदाज यशस्वी जयस्वालचंही रोहितने कौतुक केलं. पण, आपण ड्रेसिंग रुममध्ये त्याच्याशी बोललोय. आता जाहीर रित्या काही बोलणार नाही. त्याने कारकीर्दीची विलक्षण सुरुवात केली आहे. आणि ते सातत्य तो टिकवेल यासाठी संघ प्रशासन त्याला मदत करेल, असं रोहित म्हणाला. राजकोट कसोटीत दुसऱ्या डावांत भारताने ४ बाद ४३० धावा केल्यानंतर इंग्लिश संघासमोर (English team) विजयासाठी ५५७ धावांचं आव्हान होतं. पण, ४०व्या षटकांतच त्यांचा संघ १२३ धावांत गुंडाळला गेला. (Ind vs Eng 3rd Test)

इंग्लंडचा बॅझ-बॉलचा प्रयोग भारतात फसतोय का, अशी चर्चा रंगत असली तरी इंग्लिश कर्णधार बेन स्टोक्सने बॅझबॉलची बाजू घेत तो म्हणाला, ‘सगळ्यांना मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. पण, आम्ही मालिकेत १-२ असे पिछाडीवर आहोत. आणि आम्हाला ३-२ अशी मालिका जिंकण्याची संधी आहे. तेच आम्हाला करायचंय. हीच वस्तुस्थिती आहे,’ असं स्टोक्स म्हणाला. दोन्ही संघ आता चौथ्या कसोटीसाठी रांचीला रवाना होतील. चौथी कसोटी २३ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. (Ind vs Eng 3rd Test)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.