Ind vs NZ, 2nd Test : पुणे कसोटीत न्यूझीलंडचा ११३ धावांनी विजय, मालिकाही जिंकली

Ind vs NZ, 2nd Test : तब्बल १२ वर्षांनी भारताने मायदेशात मालिका गमावली आहे.

44
Ind vs NZ, 2nd Test : पुणे कसोटीत न्यूझीलंडचा ११३ धावांनी विजय, मालिकाही जिंकली
  • ऋजुता लुकतुके

पुणे कसोटीत ३ दिवस वर्चस्व राखत अखेर न्यूझीलंडने भारताचा ११३ धावांनी दिमाखदार पराभव केला आहे. विशेष म्हणजे धिमी खेळपट्टी बनवण्याचा इशारा स्थानिक क्युरेटरला देणारा भारतीय संघ यावेळी स्वत:च फिरकीच्या जाळ्यात अडकला. आणि संघातील अनुभवी फिरकी गोलंदाज मात्र किवी फलंदाजांना झटपट बाद करू शकले नाहीत. तिसऱ्या दिवशी भारतीय संघासमोर विजयासाठी ३५९ धावांचं आव्हान होतं. त्यासाठी अडीच दिवस त्यांच्याकडे होते. पण, अडीच सत्रांमध्ये भारतीय संघ २४५ धावांत सर्वबाद झाला. या विजयाबरोबरच किवी संघाने मालिकेतही २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. (Ind vs NZ, 2nd Test)

२०१२ नंतर सलग १८ मालिका विजयांनंतर भारताने मायदेशात मालिका गमावली आहे. इतकंच नाही तर याचा फटका भारतीय संघाला आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतही बसणार आहे. पुणे कसोटीत भारताची फलंदाजी सलग दुसऱ्यांदा अपयशी ठरली. आणि जे न्यूझीलंडच्या फलंदाजांना जमलं ते भारतीय फलंदाजांना दोन्ही डावात जमलं नाही, फिरकीपटूंवर वर्चस्व गाजवणं. मिचेल सँटनर किवी संघाचा हीरो ठरला. त्याने सामन्यात १३ बळी मिळवले. आणि मोलाच्या ३७ धावाही केल्या. (Ind vs NZ, 2nd Test)

(हेही वाचा – Mohammed Shami : ऑस्ट्रेलियन दौऱ्यात मोहम्मद शमी का नाही?)

भारतासाठी बंगळुरू कसोटीप्रमाणेच इथंही फलंदाजांचं अपयश नडलं. तिसऱ्या दिवशीचा खेळ सुरू झाला तेव्हा न्यूझीलंडकडे दुसऱ्या डावात ३०१ धावांची आघाडी होती. पण, पहिल्या सत्रात त्यांचे उर्वरित ४ फलंदाज ६० घावांच्या आत बाद करणं भारतीय खेळाडूंना जमलं. आणि किवी संघ २५५ धावांमध्ये गुंडाळला गेला. वॉशिंग्टन सुंदरने ४ तर जाडेजाने ३ बळी मिळवले. आणि भारतासमोर विजयासाठी ३५९ धावांचं लक्ष्य होतं. खेळण्यासाठी अडीच दिवस होते. (Ind vs NZ, 2nd Test)

पण, भारतीय फलंदाजी बहरलीच नाही. आणि शुभमन गिल, यशस्वी जयसवालचा अपवाद वगळता संघासाठी एकही अर्धशतकी भागिदारी झाली नाही. जयसवालने ७७ धावा केल्या आणि शुभमन गिलने २३. बाकी रोहीत शर्मा (८), विराट कोहली (१७), सुंदर (२१), रिषभ पंत (०) आणि सर्फराझ खान (९) ही कागदावर मजबूत वाटणारी फलंदाजांची फळी एका मागून एक तंबूत परतली. तिथेच भारताचा पराभव स्पष्ट झाला. (Ind vs NZ, 2nd Test)

यापूर्वी २०१२ मध्ये इंग्लिश संघाने भारतावर भारतात २-१ ने विजय मिळवला होता. तर किवी संघ भारतात एकदाही मालिका विजय मिळवू शकलेला नव्हता. त्यांनी आतापर्यंत भारतात फक्त ३ कसोटी जिंकल्या होत्या. त्यातील शेवटची १९८८ मध्ये मुंबईत ते जिंकले होते. हे सगळं अपयश एकाच मालिकेत किवी संघाने धुवून काढलं आहे. भारतातील मालिकेत एकापेक्षा जास्त कसोटी जिंकणारा टॉम लिथम हा पहिली किवी कर्णधार ठरला आहे. (Ind vs NZ, 2nd Test)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.