IND vs NZ : भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात जेव्हा प्रेक्षक महम्मद शामीच्या नावाचा गजर करतात…

या विश्वचषकाच्या पहिल्या चार सामन्यात महम्मद शामीला संधी मिळाली नव्हती. पण, न्यूझीलंड विरुद्‌ध जेव्हा ती मिळाली, त्याने ५ बळी मिळवून ती संधी साधली. धरमशालामधील प्रेक्षकही यावेळी शामीबरोबर होते

76
IND vs NZ : भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात जेव्हा प्रेक्षक महम्मद शामीच्या नावाचा गजर करतात…
IND vs NZ : भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात जेव्हा प्रेक्षक महम्मद शामीच्या नावाचा गजर करतात…

ऋजुता लुकतुके

भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात तेव्हा न्यूझीलंडच्या (IND vs NZ) आघाडीच्या फळीने मोठी मजल मारली होती. ४४व्या षटकात तर त्यांची अवस्था पाच बाद २४३ अशी सुस्थितीत होती. शेवटच्या षटकांमध्ये फटकेबाजी करून त्यांना २९०-३०० पर्यंत धावसंख्या नक्की वाढवता आली असती, अशीच तेव्हाची स्थिती होती.

पण, या विश्वचषकातील आपला पहिलाच सामना खेळणाऱ्या महम्मद शामीने आपल्या दुसऱ्या स्पेलमध्ये कमाल केली. शेवटच्या पाच षटकांमध्ये त्याने तीन किवी फलंदाजांना बाद केलं. आणि संपूर्ण सामन्यात त्याची आकडेवारी होती ५५ धावांमध्ये पाच बळी. त्याच्या प्रभावी गोलंदाजीमुळेच किवी संघाला आपण २७३ धावांमध्ये रोखू शकलो. सामनावीराचा पुरस्कार महम्मद शामीलाच मिळाला.

चार सामने डगआऊटमध्ये बसलेल्या शामीला न्यूझीलंड (IND vs NZ) विरुद्ध संधी मिळाली, तेव्हा प्रेक्षकांनीही त्याला चांगली साथ दिली. खासकरून तो बळी मिळवत असताना प्रेक्षक सातत्याने ‘शामी, शामी!’ अशा घोषणा देत होते. आणि मैदानावर एक वेगळाच माहोल तयार झाला होता.

या पाठिंब्यावर मग शामीचा खेळ आणखीच खुलला. नवव्या षटकात शामीला पहिली संधी मिळाली. तेव्हाही पहिल्याच चेंडूवर त्याने धोकादायक विल यंगला बाद केलं. आणि त्यानंतर जम बसलेले रचिन रवींद्र (७५), डेरिल मिचेल (१३१), मिचेल सँटर (१) आणि मॅट हेन्री (१) यांचे बळी त्याने टिपले. प्रेक्षक अखंड शामीचा जयघोष करत होते.

प्रेक्षकांच्या पाठिंब्याविषयी सामनावीर पुरस्कार सोहळ्यादरम्यान शामीला विचारलं असता त्याने प्रेक्षकांचे आभार मानले. ‘तुम्ही काही कालावधीनंतर संघात पुनरागमन करता, तेव्हा काही गोष्टी महत्त्वाच्या असतात. एकतर चांगली सुरुवात मिळणं. आणि दुसरं प्रेक्षकांचा पाठिंबा मिळणं. हे दोन्ही काल शक्य झालं. प्रेक्षकांनी आम्हा सगळ्यांचाच हुरुप वाढवला,’ असं शामी सामन्यानंतर बोलताना म्हणाला.

महम्मद शामीने विश्वचषकात पाच बळी टिपण्याची कामगिरी दुसऱ्यांदा केली आहे. यापूर्वी २०१९ च्या विश्वचषकात यजमान इंग्लंड विरुद्ध त्याने ५ बळी घेतले होते. भारताकडून अशी कामगिरी विश्वचषकात दोनदा करणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे.

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.