कोहलीने ‘ते’ दोन मास्टर स्ट्रोक्स हाणले आणि पाकच्या डोळ्यासमोर काजवे चमकले! वाचा शेवटच्या दोन षटकांचा ‘थरार’

101

टी-20 विश्वचषकातील भारताने आपल्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आहे. भारताने चार गडी राखत पाकिस्तानच्या 160 धावांचे लक्ष्य पार केले आहे. यामध्ये विराट कोहली हा विजयाचा शिल्पकार ठरला असून कोहलीने 53 चेंडूत नाबाद 82 धावांची धडाकेबाज कामगिरी केली आहे. दरम्यान, शेवटच्या चेंडूपर्यंत या सामन्याचा थरार कायम होता. पण पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज महम्मद नवाजच्या शेवटच्या षटकात भारताने 16 धावा करत थरारक विजय मिळवला. पण त्याआधी कोहलीचे गेम चेंजिंग मास्टर स्ट्रोकमुळे भारताने सामना आपल्या बाजूने वळवला.

कोहलीचे मास्टर स्ट्रोक्स

मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर रंगलेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करत पाकिस्तानने भारतासमोर 160 धावांचे लक्ष्य ठेवले होते. फलंदाजी करताना भारताची सुरुवात डळमळीत झाली. अवघ्या 31 धावांवर भारताने आपले चार गडी गमावले. त्यानंतर विजयाचा कोहिनूर विराट कोहली आणि हार्दिक पांड्या यांनी भारताचा डाव सावरला. त्यांनी 5व्या विकेटसाठी 113 धावांची भागीदारी केली. भारताला शेवटच्या दोन षटकांत विजयासाठी 31 धावांची गरज होती. त्यानंतर पाकिस्तानचा सामन्यातील सर्वोत्तम गोलंदाज हरिस रौफ हा 19वे षटक टाकायला आला.

रौफच्या पहिल्या चार चेंडूत भारताला केवळ तीन धावाच मिळाल्या आणि भारत पराभवाच्या छायेत आला. पण किंग कोहलीने रौफच्या शेवटच्या दोन चेंडूंवर दणदणीत षटकार हाणले. कोहलीच्या याच दोन मास्टर स्ट्रोक्समुळे सामना पूर्णपणे भारताच्या बाजूने फिरला.

शेवटच्या षटकाचा थरार

महम्मद नवाजच्या शेवटच्या षटकात भारताला जिंकण्यासाठी 16 धावांची गरज असताना हार्दिक पांड्या पहिल्याच चेंडूवर बाद झाला. त्यानंतर आलेल्या दिनेश कार्तिकने एक धाव काढत कोहलीला स्ट्राईक दिली. शेवटच्या षटकातील तिस-या चेंडूवर कोहलीने 2 धावा काढल्या. त्यानंतर चौथ्या चेंडूवर कोहलीने नो बॉलवर षटकार ठोकला. त्यामुळे भारताला 3 चेंडूत 6 धावांची गरज होती. फ्री हिटचा चेंडू नवाजने वाईड टाकत भारताला 3 चेंडूत 5 धावांची गरज होती.

फ्री हिट चेंडूवर कोहलीने 3 धावा काढल्या आणि भारताला विजयासाठी 2 चेंडूत 2 धावांची गरज असताना दिनेश कार्तिक बाद झाला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या अश्विनला नवाजने पुन्हा एकदा वाईड चेंडू टाकला. शेवटच्या चेंडूवर भारताला जिंकण्यासाठी एका धावेची गरज असताना अष्टपैलू फलंदाज रविचंद्रन अश्विन याने चौकार ठोकत भारताला विजय मिळवून दिला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.