-
ऋजुता लुकतुके
६७ वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा अहिल्यानगरमध्ये पार पडली. पण, त्यात मैदानावरील पेचांपेक्षा वाद, भांडणं आणि माऱ्यामाऱ्याच जास्त झाल्या. पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळला महाराष्ट्रकेसरीची गदा मिळाली खरी. पण, ती त्याने जिंकली नाही तर प्रतिस्पर्धी महेंद्र गायकवाडने लढतच सोडल्यामुळे त्याला ती बहाल करण्यात आली. उपांत्य फेरीपासूनच खेळाडू आणि पंच यांच्यात वाद झडत होते. पंचांचे गुण खेळाडूंना मान्य होत नव्हते. जोडीला दोन आखाड्यांमधील वादही रंगत होते. आणि अशा परिस्थितीत पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ आणि सोलापूरचा महेंद्र गायकवाड यांच्यात अंतिम लढत सुरू झाली. (Maharashtra Kesari Kusti)
पहिला गुण मोहोळने घेतला. तर दुसरा महेंद्रने. यानंतर तिसरा गुण पंचांनी मोहोळला बहाल करताच महेंद्र आणि त्याचे पाठीराखे चिडले. त्यांनी आधी मैदानातच वाद घातला. आणि त्यानंतर महेंद्र गायकवाडने सरळ मैदान सोडलं. अखेर पृथ्वीराजला विजेता घोषित करण्यात आलं आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते त्याला चांदीची गदा प्रदान करण्यात आली. दोन्ही बाजूच्या प्रेक्षकांनीही सामन्यात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. पण, पोलिसांनी त्यांना वेळेत रोखलं. (Maharashtra Kesari Kusti)
एकंदरीतच ही महाराष्ट्र केसरी स्पर्धा वादांमुळेच जास्त लक्षात राहिली. हा वाद सुरू झाला तो उपान्त्य सामन्यात पृथ्वीराज मोहोळ आणि नांदेडचा डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे यांच्यात ही लढत सुरू होती. अटीतटीची लढाई असताना पंचांनी गुणांचा कौल पृथ्वीराजच्या बाजूने दिला. तो अंतिम फेरीत जाणार हे निश्चित झाले. हा निकाल शिवराज आणि त्याच्या समर्थकांना रुचला नाही. आणि त्यांनी मॅटवरच धुमाकूळ घातला. राक्षेने तर पंचांच्या दिशेने धाव घेतली. आणि त्यांना लाथही मारली. एकूणच या स्पर्धेत पंचांचे अनेक निर्णय हे वादग्रस्त ठरले. पण, सध्या खेळाडूंवरच शिस्तभंगाची कारवाई होऊन ही स्पर्धा संपली आहे. (Maharashtra Kesari Kusti)
(हेही वाचा- Ind vs Eng, 5th T20 : अभिषेक शर्माचं ३७ चेंडूंत शतक, युवराज, सचिनकडून कौतुक )
राक्षे आणि महेंद्र गायकवाड या दोघांना कुस्ती महासंघाने ३ वर्षांसाठी निलंबित केलं आहे. (Maharashtra Kesari Kusti)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community