Most Wickets in a Test Match : एका कसोटीत सर्वाधिक बळी घेणाऱ्या ५ गोलंदाजांमध्ये आहे ‘हा’ भारतीय

पहिल्या पाच गोलंदाजांमध्ये एक भारतीय आहे. पण, तो अनिल कुंबळे नाही

104
Most Wickets in a Test Match : एका कसोटीत सर्वाधिक बळी घेणाऱ्या ५ गोलंदाजांमध्ये आहे ‘हा’ भारतीय
Most Wickets in a Test Match : एका कसोटीत सर्वाधिक बळी घेणाऱ्या ५ गोलंदाजांमध्ये आहे ‘हा’ भारतीय
  • ऋजुता लुकतुके

अनिल कुंबळेनं पाकिस्तानविरुद्ध दिल्ली कसोटीत ७४ धावांत १० बळी घेतले तो दिवस कुणीही विसरणार नाही. दहाच्या दहा बळी एकाच गोलंदाजाने घेण्याची क्रिकेटच्या इतिहासातील दुसरी आणि आधुनिक क्रिकेटमधील पहिलीच खेप होती. भारतीय संघाने ती कसोटी तर जिंकलीच. शिवाय अनिल कुंबळेच्या नावावर एक अनोखा विक्रम लागला. त्या कसोटीत पहिल्या डावात कुंबळेनं ७० धावांत ४ बळी मिळवले होते. आणि दुसऱ्या डावातील दहा बळी धरून त्याची कसोटीतील कामगिरी झाली १४४ धावांत १४ बळी. (Most Wickets in a Test Match)

पण, विशेष म्हणजे कसोटीच्या दोन्ही डावांत मिळून सर्वाधिक बळी घेण्याच्या विक्रमापासून कुंबळे दूरच राहिला. कुंबळे नाही पण, आणखी एक भारतीय गोलंदाज मात्र या यादीत पहिल्या पाचांत आहे. ही यादी पाहूया,

जिम लेकर कुंबळेच्या आधी डावांत १० बळी टिपण्याची कामगिरी या इंग्लिश फिरकीपटूने केलेली होती. ते साल होतं १९५६. आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध ओल्ड ट्रॅफर्ड इथं इंग्लंडने १७० धावांनी विजय मिळवला. पहिल्या डावांतील इंग्लंडच्या ४५९ धावांना उत्तर देताना ऑस्ट्रेलियाचा डाव ८४ धावांत गडबडला. आणि यात लेकर यांनी ३७ धावांत ९ बळी टिपले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाला फॉलो-ऑन मिळाला. आणि यावेळी लेकर यांनी दहाच्या दहा बळी घेतले. जवळ जवळ अडीच दिवस ते गोलंदाजी करत होते. आणि त्यांनी ९० धावांत १९ बळी घेतले. एका कसोटीत सर्वाधिक बळींचा त्यांचा विक्रम आजही अबाधित आहे.

(हेही वाचा – 8th Pay Commission चा प्रस्तावच नाही ?; काय म्हणते केंद्र सरकार…)

सिडनी बार्न्स लेकर यांच्यापूर्वी कसोटीत सर्वाधिक बळींचा विक्रम इंग्लंडच्याच सिडनी बार्न्स यांच्या नावावर होता. त्यांनी १९१३ मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाविरुद्ध १५९ धावा देत १७ बळी मिळवले होते. यात पहिल्या डावांत बार्न्स यांनी ६० धावा देत ८ बळी मिळवले. तर दुसऱ्या डावात १०३ धावांत त्यांनी ९ बळी टिपले. हा कसोटी सामनाही इंग्लंडने १ डाव आणि १२ धावांनी जिंकला.
नरेंद्र हिरवाणी कसोटी सर्वाधिक बळी मिळवणारा तिसरा यशस्वी गोलंदाज आहे तो भारताचा नरेंद्र हिरवाणी. त्याने १९८८ मध्ये चेन्नई कसोटीत १३६ घावा देत १६ बळी मिळवले होते. ही कसोटी कपिल देवच्या शतकासाठीही लक्षात राहील. कपिलच्या शतकाच्या जोरावर भारताने पहिल्या डावात ३८२ धावा केल्या. आणि मग हिरवाणीच्या ६८ धावांत ८ बळींमुळे भारताने विंडिजचा पहिला डाव १८४ धावांत गुंडाळला. भारताने दुसऱ्या डावात २१७ धावा केल्या. आणि कसोटीच्या चौथ्या डावांत विंडिज संघ पुन्हा एकदा हिरवाणीच्या फिरकीच्या जाळ्यात अडकला. त्याने यावेळी ७५ धावांत ८ बळी मिळवले. आणि भारताला २५५ धावांनी विजय मिळवून दिला.

(हेही वाचा – Monsoon Update: २३ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट: मुंबईत समुद्राला येणार भरती; जाणून घ्या पावसाचे काय आहेत अपडेट?)

रॉबर्ट मेस्सी लायनेल मेस्सीचं आडनाव धारण करणारा ऑस्ट्रेलियाचा तेज गोलंदाज रॉबर्ट मेस्सीने १९७२ मध्ये इंग्लंडविरुद्ध एका कसोटीत १३७ धावांत १६ बळी मिळवले. लॉर्ड्सवर ही कामगिरी करताना मेस्सी यांनी प्रत्येक डावांत ८ बळी मिळवले. दुसऱ्या डावांत तर ५५ षटकांत त्यांनी डेनिस लिलीच्या साथीने इंग्लंडचा डाव ११६ धावांत गुंडाळला.
मुथय्या मुरलीधरन श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. मोठ्या धावसंख्येच्या या सामन्यात मुथय्या मुरलीधरन हा दोन्ही संघातील फरक होता. कारण, इंग्लंड आणि श्रीलंका यांनी पहिल्या डावात अनुक्रमे ४४५ आणि ५९१ अशा मोठ्या धावसंख्या रचल्या. पण, मुरलीधरनने दुसऱ्या डावात ६५ धावांत ९ बळी मिळवले आणि इंग्लंडचा पराभव निश्चित केला. त्याने या कसोटीत एकूण २२० धावांत १६ बळी मिळवले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.