यंदाच्या आयपीएलमध्ये दोनच संघ असे आहेत ज्यांना अजूनही पहिला विजय मिळवता आला नाही. हे दोन संघ म्हणजे मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स. गेल्या काही हंगामांपासून मुंबई इंडियन्सला सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागत आहे. यंदाच्या मोसमात देखील तशीच सुरूवात झाली आहे. म्हणूनच मुंबईला स्लो स्टार्टर म्हणून संबोधले जाते.
( हेही वाचा : ‘एकनाथ शिंदेंना उडवणार’, मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात )
तर दुसरीकडे दिल्लीला अजून लय सापडली नसून, सलग तीन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. दोन्ही संघाना आता विजय मिळवणे गरजेचे आहे. सामना जिंकवणारे मॅच विनर दोघांकडेही आहेत, पण त्यांना म्हणावी तशी फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही.
जबाबदारी घेऊन खेळणे गरजेचे
मुंबई आणि दिल्लीच्या फलंदाजीत खूप ताकदीचे खेळाडू आहेत पण त्यांना मोक्याच्या क्षणी आपला खेळ उंचवता आलेला नाही. त्यामुळे जबाबदारी घेण्यास फलंदाज असमर्थ ठरत आहेत, त्यामुळे संघांतील वरिष्ठ खेळाडूंनी पुढाकार घेऊन सामने कसे जिंकवता येतील याकडे खूप बारकाईने पाहिले पाहिजे. सध्या दोन्ही संघांमध्ये नव्यादमाचे खेळाडू आहेत. त्यांच्या क्षमतेचा पुरेपूर वापर करून त्यांना अधिक संधी दिल्या गेल्या पाहिजे.
टिम डेविड, कॅमरुन ग्रीन आणि ट्रिस्टन स्ट्ब्सने मुंबईला निराश केले आहे. मागच्या मोसमात तिलक वर्माच्या रुपाने मुंबईला चांगला फलंदाज मिळाला. त्याने बंगळुरू विरूद्धच्या पहिल्या सामन्यात 84 धावा केल्या. मात्र त्याच्याशिवाय अन्य दुसरे फलंदाज चांगली कामगिरी करु शकलेले नाहीत. कर्णधार रोहित शर्माला सुद्धा चांगल्या धावा कराव्या लागतील यामुळे अन्य फलंदाजांमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल.
दिल्लीच्या संघात पृथ्वी शॉ, सर्फराज खान, अक्षर पटेल यांची बॅट अजून तळपलेली नाही, तसेच एनरिक नॉर्खिया,अभिषेक पोरेल, मुकेश कुमार, खलील अहमद यांनीही म्हणावी तशी गोलंदाजी केलेली नाही. कर्णधार डेविड वॉर्नर एकटा धावा करतोय पण त्याला एकट्याला संघासाठी सामना जिंकवून देता येणार नाही.
दिल्ली आपल्या घरच्या मैदानात अरुण जेटली स्टेडियममध्ये खेळणार आहे. त्यांना याचा नक्कीच फायदा होईल, पण मुंबईचा संघ देखील तगडा आहे त्यामुळे क्रिकेटप्रेमींना चुरशीची लढत बघायला मिळू शकते.
Join Our WhatsApp Community