भारताने रविवारी तिसर्या आणि शेवटच्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात श्रीलंकेचा सहा गडी राखून पराभव करत तीन सामन्यांची मालिका 3-0 ने व्हाईट वॉश केला. या मालिकेत श्रीलंकेच्या गोलंदाजांना भारताचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरला बाद करता आले नाही. तिसऱ्या सामन्यात श्रेयस अय्यरने नाबाद 73 धावा करत भारताला विजय मिळवून दिला. यासह श्रेयस अय्यरने विराट कोहलीचा मोठा विक्रम मोडीत काढला. अय्यर तीन सामन्यांच्या T20 मालिकेत भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. या मालिकेत त्याने तीन डावात एकूण 204 धावा केल्या आहेत.
श्रेयस अय्यर कदाचित त्याच्या कारकिर्दीच्या सर्वोत्तम टप्प्यात आहे. तिसऱ्या T20 (भारत विरुद्ध श्रीलंका) मध्ये त्याने 45 चेंडूत नाबाद 73 धावा केल्या. 9 चौकार आणि एक षटकार मारला. त्याच्या या शानदार खेळीच्या जोरावर भारताने हा सामना 6 गडी राखून जिंकला आणि मालिकेत 3-0 असा क्लीन स्वीपही केला. श्रीलंकेने प्रथम खेळताना 5 विकेट गमावत 146 धावा केल्या होत्या. पण भारताने 16.5 षटकांत 4 विकेट्स मिळवल्या. अय्यर संपूर्ण मालिकेत नाबाद राहिला आणि त्याने सर्व 3 सामन्यांमध्ये अर्धशतके झळकावली. T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचा हा सलग 12 वा विजय आहे. आता भारत आणि श्रीलंका यांच्यातील २ सामन्यांची कसोटी मालिका 4 मार्चपासून सुरू होणार आहे.
(हेही वाचा Russia Ukraine War : जग पुन्हा जातेय का अणु युद्धाच्या दिशेने?)
32 डावात 6 अर्धशतके
श्रेयस अय्यरच्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यातील कामगिरीवर नजर टाकली तर त्याने 32 डावांमध्ये 37 च्या सरासरीने 809 धावा केल्या आहेत. 6 अर्धशतके केली आहेत. त्याने नाबाद 74 धावांची सर्वात मोठी खेळी खेळली. याच मालिकेत त्याने ही धावसंख्याही केली. या दरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 141 आहे. एकूण T20 मध्ये त्याने 2 शतके आणि 28 अर्धशतके केली आहेत. त्याने 2 कसोटी सामन्यांमध्ये 51 च्या सरासरीने 202 धावा केल्या आहेत तर 26 एकदिवसीय सामन्यांमध्ये 41 च्या सरासरीने 927 धावा केल्या आहेत.
Join Our WhatsApp Community