भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये वन-डे क्रिकेट सामन्यांचा महत्नाचा सामना झाला. त्यामध्ये 108 धावांत न्यूझीलंडच्या संपूर्ण संघाला भारतीय संघाने तंबूत पाठवले. ज्यामुळे आता केवळ 109 धावांचे माफक लक्ष्य गाठून भारताला सामना जिंकता येणार आहे. विशेष म्हणजे हा सामना जिंकून भारत मालिकाही 2-0 ने विजयी आघाडी घेत खिशात घालू शकतो. भारताच्या सर्वच गोलंदाजांनी आज अप्रतिम कामगिरी केली. यावेळी मोहम्मद शमी याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे आज गोलंदाजी केलेल्या भारताच्या सर्व गोलंदाजांना विकेट मिळवता आल्या आहेत.
अशी केली गोलंदाजी
सामन्यात सर्वप्रथम भारताने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात तसंच फलंदाजी निवडत विजय मिळवला होता. याशिवाय मागील काही एकदिवसीय सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत अगदी विशाल धावसंख्या उभारली होती. आजही नाणेफेक जिंकून भारत फलंदाजी घेईल असे वाटत होते. पण भारताने असे न करता गोलंदाजी निवडली. पण गोलंदाजांनी हा निर्णय अगदी पहिल्या ओव्हरपासून योग्य असल्याचे दाखवले. शमीने पहिलेच षटक निर्धाव टाकत एक विकेटही घेतली. ज्यानंतर सर्वच गोलंदाजांनी कमाल गोलंदाजी केली. विशेष म्हणजे भारताकडून गोलंदाजी केलेल्या सहाही गोलंदाजांच्या खात्यात किमान एकतरी विकेट आली. यावेळी सर्वाधिक विकेट्स शमीने तीन घेतल्या. तर पांड्या आणि सुंदर यांनी प्रत्येकी दोन विकेट्स मिळवल्या. तर सिराज, कुलदीप आणि शार्दूल यांनी प्रत्येकी एक विकेट मिळवली. न्यूझीलंडच्या फलंदाजीचा विचार करता सर्वाधिक धावा ग्लेन फिलिप्सने (36) केल्या. तर ब्रेसवेल (22) आणि सँटनर (27) यांनीही थोड्याप्रमाणात डाव सावरल्यामुळे न्यूझीलंडता संघ 100 धावांचा आकडा गाठू शकला.
(हेही वाचा पुण्यातील दोन्ही पोटनिवडणुका बिनविरोध होण्याची शक्यता कमी)