Virat Kohli : ऑस्ट्रेलियन संघाकडून भारताने असा मिळवला आदर, ऐका विराटच्या शब्दात

Virat Kohli : २०१४ पासून बोर्डर-गावस्कर चषक भारताकडेच आहे.

67
Virat Kohli : ऑस्ट्रेलियन संघाकडून भारताने असा मिळवला आदर, ऐका विराटच्या शब्दात
  • ऋजुता लुकतुके

अलीकडच्या काळात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान होणाऱ्या पारंपरिक ॲशेस मालिके इतकंच महत्त्व भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान होणाऱ्या बोर्डर-गावस्कर चषकाला आलं आहे. याचं कारण आहे मागच्या १० वर्षांत खेळवल्या गेलेल्या चुरशीच्या मालिका आणि ऑस्ट्रेलियन भूमीवरही भारताने मिळवलेले विजय. त्यामुळेच स्टार फलंदाज विराट कोहलीच्या (Virat Kohli) मते भारतीय संघाने आता ऑस्ट्रेलियात खेळतानाही आदराची जागा मिळवली आहे. एकेकाळी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अशी कसोटी मालिका ही त्वेषाने खेळली जायची. त्यात तीव्र स्पर्धा होती. पण, आता हळू हळू दोन्ही संघांनी एकमेकांसाठी आदर कमावला आहे, असं विराटचं म्हणणं आहे.

विराटनेच भारतीय संघाला ऑस्ट्रेलियात दोन मालिका जिंकून दिल्या आहेत. त्यामुळे त्याच्या म्हणण्याला नक्कीच महत्त्व आहे. ‘एकेकाळी दोन्ही संघांमध्ये तीव्र स्पर्धा होती आणि त्यामुळे मैदानावरही ताण असायचा. खेळाडू त्वेषाने ही मालिका खेळायचे. पण, जसजशी वर्ष जात राहिली, दोन्ही संघ एकमेकांकडे असलेल्या कौशल्याचा आदर करायला शिकले आहेत,’ असं विराट (Virat Kohli) एका पॉडकास्टमध्ये बोलताना म्हणाला.

(हेही वाचा – Harshvardhan Patil करणार शरद पवार गटात प्रवेश; कार्यकर्ता मेळाव्यामध्ये केली घोषणा)

२२ नोव्हेंबरपासून भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा सुरू होणार आहे. पहिला कसोटी सामना पर्थला होणार आहे. या सामन्याचं थेट प्रसारण स्टार स्पोर्ट्सवर होईल. या वाहिनीवरच विराटने (Virat Kohli) आपलं हे मत व्यक्त केलं आहे. यंदा विशेष म्हणजे ही मालिका ५ कसोटी सामन्यांची होणार आहे. १९९१ नंतर पहिल्यांदाच दोन्ही संघ ५ कसोटींची मालिका खेळणार आहेत. ‘भारतीय कसोटी संघाला कमी लेखण्याची चूक आता कोणी करत नाही. आम्ही ऑस्ट्रेलियात सलग दोन मालिका जिंकल्या तेव्हाच तो आदर आम्ही कमावला. त्यानंतर बोर्डर-गावस्कर चषक तुल्यबळ संघांमधील स्पर्धा बनला आहे,’ असं विराटने बोलून दाखवलं.

खुद्द विराट कोहली (Virat Kohli) ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळताना विशेष तयारीने खेळतो. तीनही प्रकारात मिळून ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्याने तब्बल १६ शतकं ठोकली आहेत. ऑस्ट्रेलिया विरुद्ध २५ कसोटी सामन्यांमध्ये ४७ च्या सरासरीने त्याने २,०४२ धावा केल्या आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.