Women’s T20 World Cup : भारतीय महिला क्रिकेट संघाच्या दारुण पराभवाची ५ कारणं

Women's T20 World Cup : साखळी सामन्यातील २ पराभवांनंतर भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात आलं आहे. 

83
Women's T20 World Cup : भारतीय महिला क्रिकेट संघाच्या दारुण पराभवाची ५ कारणं
  • ऋजुता लुकतुके

महिलांच्या टी-२० विश्वचषकाला दुबईत सुरुवात झाली तेव्हा पुरुषांप्रमाणेच महिला संघही टी-२० विश्वचषक जिंकून दाखवेल अशी गर्जना महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत सिंगने केली होती. संघाला शुभेच्छाही तशाच देण्यात येत होत्या. पुरुष संघाने अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये झालेला टी-२० विश्वचषक जिंकला. तिथपासून देशात एक वेगळंच वातावरण तयार झालं होतं. पण, पुरुषांनी मिळवलेल्या यशाची पुनरावृत्ती महिला संघाला करता आली नाही.

पहिल्या सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध झालेला पराभव, पाकिस्तान विरुद्धची कमी धावगती आणि त्यानंतर ऑस्ट्रेलिया विरुद्ध प्रयत्न करूनही ७ धावांनी झालेला निसटता पराभव यामुळे साखळीतच भारताचं आव्हान संपुष्टात आलं. उलट ऑस्ट्रेलियाने साखळीतील सर्व सामने जिंकले. तर न्यूझीलंडनेही ३ सामने जिंकून बाद फेरीतील प्रवेश नक्की केला. भारतीय खेळाडूंची कामगिरी अख्ख्या स्पर्धेत एकसंध दिसलीच नाही. पण, प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांना आणखीही काही मुद्यांचा विचार करावा लागणार आहे. भारतीय पराभवाची चर्चा करताना ५ प्रमुख कारणं पाहूया, (Women’s T20 World Cup)

(हेही वाचा – Governor appointed MLA : राज्यपाल नियुक्त आमदारांवर टांगती तलवार; मात्र उबाठाच्या मागणीला न्यायालयाचा नकार)

१. स्मृती मंधानाचं अपयश – एरवी स्मृती प्रमुख खेळाडूंपैकी एक असली तरी या स्टार खेळाडूला टी-२० विश्वचषकात लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. टी २० विश्वचषकात ५०० धावा पूर्ण करणारी तिसरी महिला क्रिकेटपटू होण्याचा मान तिने या स्पर्धेत मिळवला. पण, एरवी तिची कामगिरी विसरण्यासारखीच होती. श्रीलंकेविरुद्धचं अर्धशतक सोडलं तर ती एकेरी धावांमध्येच बाद झाली. सुरुवातीचं हे अपयश संघाला नक्कीच भोवलं. कारण ३ सामन्यांत चांगली सुरुवातच मिळाली नाही.

२. फलंदाजांच्या कामगिरीत सातत्याचा अभाव – एरवी स्मृती शेफाली वर्मा, जेमिमा रॉडरिग्ज, हरमनप्रीत आणि रिचा घोष ही कागदावर बलाढ्य वाटणारी फलंदादांची फळी आहे. पण, मैदानात ही फळी सातत्याने चमकली नाही. एकाच सामन्यात किमान दोन खेळाडू चमकदार खेळ करतील असं अभावानेच घडलं. त्यामुळे सुरुवातीला न्यूझीलंड विरुद्ध पराभव झाला. पाकिस्तान विरुद्ध विजय मिळवूनही धावगती कमीच राहिली. याचा फटका संघाला बसला. (Women’s T20 World Cup)

(हेही वाचा – Mohammed Shami : मोहम्मद शामीची अनुपस्थिती भारतीय संघ कशी भरून काढणार?)

३. धावा चोरण्यातील दौर्बल्य – महिला क्रिकेटमध्येही तंदुरुस्ती महत्त्वाची ठरत असताना भारतीय खेळाडू मात्र धावा चोरण्यात कमी पडले. एकेरी धावांना दुहेरीत बदलण्यात भारतीय खेळाडूंना लक्षणीय अपयश आलं. शिवाय भारतीय खेळाडूंनी नाहक डॉट बॉल दिले. एकीकडे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संघांनी याच जोरावर सामने आपल्या बाजूने पलटवत असताना भारतीय फलंदाज यात कमी पडले. दुबईची खेळपट्टी मूळातच धिमी आहे. अशावेळी शैलीत बदल करण्यात खेळाडू कमी पडले.

४. खराब क्षेत्ररक्षण – खराब क्षेत्ररक्षणाची चर्चा यापूर्वीही सोशल मीडियावर झाली आहे. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारतीय संघाची सुरुवाच चांगली झाली होती. आणि चांगल्या गोलंदाजीमुळे संघाने प्रतिस्पर्ध्यांना कोंडीत पकडलं होतं. पण, अशावेळी दोन्ही सामन्यात खेळाडूंनी १० ते १५ अतिरिक्त धाव्या या संघांना दिल्या त्या गचाळ क्षेत्ररक्षणामुळे. रिचा घोषने सोडलेला झेल आणि हुकलेल्या धावचीतच्या संधी भारतीय संघाला पुढील काही काळ आठवत राहतील. (Women’s T20 World Cup)

(हेही वाचा – राखीव खेळाडूंना ऑस्ट्रेलिया मध्ये घेऊन जाण्याचा विचार – Rohit Sharma)

५. धरसोडपणाची रणनीती – स्पर्धेपूर्वी खेळाडूंची तयारी पूर्ण असल्याचं हरमनप्रीत आणि मुख्य प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांनी म्हटलं होतं. तिसऱ्या क्रमांकावर कोण खेळणार ते ठरलंय असंही मुझुमदार म्हणाले होते. पण, प्रत्यक्षात कधी हरमनप्रीत तर कधी जेमिमा अशी त्यांची रणनीती राहिली. खेळाडूंमध्ये त्यांना काय भूमिका वठवायची आहे याविषयी स्पष्टता दिसली नाही. पूजा वस्त्रकारच्या दुखापतीविषयी शेवटपर्यंत कुणाला सांगण्यात आलं नाही. ती दुबईला पोहोचण्यापूर्वीच दुखापतग्रस्त होती, तर तिला खेळवलंच का, संजना संजीवनला खास संघात घेतलं असताना धिम्या खेळपट्ट्यांवर तिचा वापर का झाला नाही, असे प्रश्न अनुत्तरितच राहिले. (Women’s T20 World Cup)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.