महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला (ST Corporation, एसटी) यंदा शासनाकडून मागणीच्या तुलनेत केवळ निम्माच निधी मिळाला आहे. परिणामी, मार्च महिन्याचे कर्मचाऱ्यांचे वेतन पूर्णपणे जमा झालेले नाही. कर्मचाऱ्यांना फक्त ५६% वेतन मिळाले असून, उरलेले ४४% कधी जमा होईल, याबाबत अनिश्चितता आहे. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये (ST Employees) चिंतेचे वातावरण पसरले आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत अर्थ खात्यावर नाराजी व्यक्त केली असून, वेळेवर निधी मिळाला तरच महामंडळाला फायदा होईल, असे मत मांडले.
(हेही वाचा – Pratap Sarnaik यांची एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती: निर्णय फिरवण्यामागील कारणे)
एसटी महामंडळाने (Maharashtra State Road Transport Corporation) शासनाकडे सुमारे ९९५ कोटी रुपयांची मागणी केली होती, परंतु प्रत्यक्षात केवळ २७२ कोटी रुपये मिळाले. यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन, भविष्य निर्वाह निधी, ग्रॅच्युइटी यासारख्या देण्यांवर परिणाम झाला आहे. कर्मचारी संघटनांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून, वेळेवर वेतन न मिळाल्याने त्यांच्यासमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. “कर्मचाऱ्यांना अर्धेच वेतन मिळाले आहे. उरलेले पैसे कधी मिळतील, याची शाश्वती नाही,” असे एका कर्मचारी नेत्याने सांगितले.
परिवहन मंत्री सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी या संकटावर भाष्य करताना म्हटले, “वेळेवर पैसे मिळाले तरच एसटी महामंडळ तोट्यातून बाहेर येईल. पण कधी कधी अर्थ खात्याकडून निधी वेळेत मिळत नाही, याबाबत मी नाराज आहे.” त्यांनी अर्थ खात्याच्या ढिसाळ कारभारावर बोट ठेवत, संयुक्त बैठक घेऊन हा प्रश्न सोडवण्याचे संकेत दिले. “महामंडळाला आर्थिक स्थैर्य मिळाले तरच कर्मचाऱ्यांचे हित आणि प्रवाशांचे समाधान शक्य आहे,” असेही ते म्हणाले.
दरम्यान, कर्मचारी संघटनांनी सरकारकडे तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. “अर्ध्या वेतनावर आम्ही किती दिवस जगायचे?” असा सवाल कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे. या परिस्थितीमुळे एसटीच्या सेवेवरही परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. शासनाने यावर त्वरित पावले उचलावीत, अशी अपेक्षा आता सर्वांकडून व्यक्त होत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community