सोशल मीडिया भोवती फिरणारं माणसाचं आयुष्य; काय सांगतं  संशोधन ?

सध्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे आयुष्य सोशल मीडियाभोवती अडकले आहे. मात्र सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे आरोग्यावर विपरित परिणाम होत असून, याचा आरोग्यावर कसा धक्कादायक परिणाम होतो, हे एका संशोधनातून समोर आले आहे.

२०१९ मध्ये झालेल्या एका संशोधनानुसार, जे युवक दररोज किमान 3 तास सोशल मीडियावर सक्रिय असतात, अशा व्यक्तींना नैराश्य, चिंता आणि रागाच्या समस्यांना अधिक सामोरे जावे लागते.

कोणत्या समस्या उद्भवतात ? फोन आणि सोशल मीडियाच्या व्यसनामुळे अनेक जण तासनतास एकाच जागेवर बसून असतात. अनेक जण मोबाईल बघता बघता जेवण करतात. त्यामुळे न कळत वजन वाढवणाऱ्या पदार्थांचे सेवन अधिक केले जाते. ज्यामुळे वजन वाढू लागते आणि व्यक्ती लठ्ठपणा, तसेच त्याच्याशी संबंधित इतर आजारांचा सामना करावा लागतो.

मेंदू निष्क्रीय होण्याची भीती सोशल मीडियावर माहितीचे मोठे भांडार आहे. यातील अनेक बहुतांश माहिती निरुपयोगी असते. यामुळे एकाग्रता कमी होण्याबरोबरच मेंदूची क्रियाशीलता कमी होण्याची भीती असते. सततच्या मोबाईल वापरामुळे शांतपणे विचार करण्याची क्षमता कमी होते आणि मन सतत विचलित रहाते.

अपुरी झोप आपल्यापैकी अनेकांना झोपण्यापूर्वी मोबाईल बघण्याची सवय असते. काही जण झोपण्यापूर्वी तासनतास रिल्स बघत बसतात. यामुळे ऐन झोपची वेळ निघून जाते. झोपण्यापूर्वी मोबाईलच्या अतिवापरामुळे निद्रानाश आणि झोपेचे अन्य विकार जडू शकतात.