जगन्नाथ रथयात्रेची ७ जुलैपासून होणार सुरुवात; १००० यज्ञांचे पुण्य देणाऱ्या यात्रेचे वैशिष्ट्य काय? जाणून घ्या

ओडिशा राज्यातील जगन्नाथ पुरीची रथयात्रा ही जगभरात प्रसिद्ध आहे. येत्या ७ जुलैपासून या रथयात्रेला सुरुवात होणार असून ही रथयात्रा दोन दिवस रंगणार आहे. ७ आणि ८ तारखेपर्यंत ही यात्रा पार पडणार आहे.

भगवान जगन्नाथ आणि रथयात्रा पुरी हे शहर ओडिशा राज्यातील अतिशय महत्त्वाचे शहर असून, याला पुरुषोत्तम पुरी असेही म्हटले जाते. भगवान श्रीकृष्ण आणि राधा यांच्या युगल मूर्तीचे प्रतीक स्वत: भगवान श्री जगन्नाथ आहेत. विशेष म्हणजे श्रीकृष्णदेखील त्यांचेच अंश आहेत.

पुरीमध्ये भगवान जगन्नाथ, बलभद्र (बलराम) आणि सुभद्रा यांच्या अर्धनिर्मित लाकडी स्वरुपातील मूर्ती स्थापित करण्यात आल्या आहेत. या मूर्तीची निर्मिती इंद्रद्युम्न राजाने केल्याचे सांगितले जाते. जगन्नाथांची ही भव्य रथयात्रा आषाढ शुक्ल द्वितीयेला जगन्नाथ पुरीमधून सुरू होते. २ दिवस ही रथयात्रा चालते. 

या रथयात्रेमध्ये सर्वात पुढे श्री बलरामजी हाती ताल झेंडा घेऊन अग्रभागी चालतात. बलरामजींच्या मागे पद्मध्वज घेऊन जाणाऱ्या रथावर देवी सुभद्रा आणि सूदर्शन चक्र आहेत. त्यानंतर सर्वात शेवटी भगवान श्री जगन्नाथ गरुडध्वजावर विराजमान होऊन रथयात्रेत चालतात.

जगन्नाथ रथयात्रेचे महत्त्व काय? भगवान श्री जगन्नाथ यांच्या रथयात्रेबद्दल स्कंद पुराणात स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. या पुराणात उल्लेख केल्याप्रमाणे या रथयात्रेत जो व्यक्ती श्री जगन्नाथ यांच्या नामाचा जयघोष करत, किर्तन करत गुंडीचा नगरापर्यंत जातो. तो पुनर्जन्माच्या चक्रातून मुक्त होतो, असे सांगितले जाते.