राज्यातील सर्व विधानसभा क्षेत्रात ‘वीर सावरकर गौरव यात्रा’ काढणार; मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची घोषणा

112

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान करणाऱ्या राहुल गांधींचा निषेध करण्यासाठी राज्यातील सर्व विधानसभा क्षेत्रात ‘वीर सावरकर गौरव यात्रा’ काढली जाणार असल्याची घोषणा सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केली.

भाजपा-शिवसेना युतीचे आमदार, खासदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यात सहभागी होतील. येत्या दोन ते तीन दिवसांत राज्यभरात ‘वीर सावरकर गौरव यात्रे’ला सुरुवात होईल, अशी माहिती मिळत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्वातंत्र्यसमराव्यतिरिक्तही अनेक क्षेत्रात अत्यंत मोलाचे योगदान दिले. जाती निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन, मराठी भाषेचा गौरव, मराठी भाषेला अनेक शब्द देण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्या या कार्याला गौरव यात्रेत उजाळा दिला जाईल.

राहुल गांधींचा निषेध करणार

‘वीर सावरकर गौरव यात्रे’च्या माध्यमातून सावरकरांच्या कार्याचा गौरव करण्याबरोबरच राहुल गांधी यांचा निषेधही केला जाणार आहे. सावरकरांनी कितीतरी क्षेत्रात योगदान दिले. प्रत्येक देशवासी त्यांच्या अतुलनीय योगदानाचा ऋणी आहे. संपूर्ण देश आणि विशेषतः महाराष्ट्र त्यांचे योगदान कधीच विसरू शकणार नाही. त्यांच्याविषयी ऋण व्यक्त करण्यासाठी ‘वीर सावरकर गौरव यात्रा’ काढली जाणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

(हेही वाचा – राहुल गांधींच्या थोबाडात मारणार का? मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.